भूजल पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली; रोहित पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी
👤 संतोष एडके तासगाव |
📅
18 September 2026 |
👁 23 Views
दैनिक आकुर / संतोष एडके तासगाव
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित व सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी भूजल पातळी खालावत असून विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांवर ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून नागरिक, शेतकरी आणि पशुधनासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार रोहित पाटील यांनी १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांतील पावसाची प्रतिकूल स्थिती आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ग्रामीण भागातील उपलब्ध जलस्रोतांवर परिणाम होत असून आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भूजल पातळी खालावल्याने जलस्रोतांवर ताण
दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पावसाअभावी विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते. पाऊस लांबल्यास काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासू शकते. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पशुधनासाठी पाणी-चाऱ्याचीही चिंता
पावसाअभावी शेतीबरोबरच पशुधनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरू शकते. त्यामुळे संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्धतेचे नियोजन करण्याची गरज आमदार पाटील यांनी अधोरेखित केली आहे.
द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील बागायती क्षेत्रालाही पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी कमी झाल्याने द्राक्ष, ऊस तसेच अन्य बागायती पिकांना आवश्यक पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. खरीप हंगामातील पिकांवरही पावसाअभावी प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा तसेच शेती आणि बागायती पिकांचे संरक्षण यासाठी शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. मतदारसंघातील पावसाची व जलस्रोतांची सद्यस्थिती लक्षात घेऊन दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली आyहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी करावी आणि नागरिक, शेतकरी व पशुधनाला आवश्यक दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.