पुणे | प्रतिनिधी
"माझ्याकडे पैशांची ताकद नाही, माझ्याकडे गरिबांची ताकद आहे. मंत्रीपदावर असताना मी कधीही गैरव्यवहार केला नाही. माझे राजकारण स्वच्छ आणि पारदर्शक असल्यामुळेच आज मी दिल्लीशीही ठामपणे पंगा घेण्याची हिंमत ठेवतो," असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित 'युवा जोडो संकल्प अभियान'*चा शुभारंभ पुण्यातील गांजवे चौक येथील पत्रकार भवनातून जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि युवकांशी थेट संवाद साधत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचा संकल्प मांडला.
जानकर म्हणाले, "माझ्या पाठीशी श्रीमंत लोक नाहीत, तर सामान्य आणि गरीब जनतेचे आशीर्वाद आहेत. सत्तेत असताना मी त्यांना मोठ्या प्रमाणात काही देऊ शकलो नसतानाही ते आजही माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. जर मी भ्रष्टाचार केला असता, तर माझ्यामागे तपास यंत्रणा लागल्या असत्या. मात्र माझ्या प्रामाणिक राजकारणामुळे केंद्र किंवा राज्य सरकार माझे काहीही वाकडे करू शकत नाही."
पक्ष स्थापनेच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमी चोंडी येथे दलित, भटके-विमुक्त आणि वंचित समाजाला सोबत घेऊन रासपची चळवळ सुरू झाली. सुरुवातीला अवघ्या ४० कार्यकर्त्यांसह सुरू झालेल्या या प्रवासात आज लाखो लोक जोडले गेले आहेत. "राष्ट्रीय समाज पक्ष हा कोणत्याही सत्ताकेंद्राच्या आडोशाला निर्माण झालेला पक्ष नाही, तर स्वाभिमानाच्या भूमीत उभा राहिलेला जनतेचा पक्ष आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उपेक्षित समाजाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त करताना जानकर म्हणाले, "सत्ता येते-जाते; मात्र आमचे ध्येय हजारो युवकांना आमदार-खासदार बनविण्याचे आहे. पारधी, मसनजोगी आणि वंचित समाजातील तरुणांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून मंत्रीपदापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कटिबद्ध आहे."
युवकांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील तरुणांमध्ये परिवर्तन घडविण्याची अफाट ताकद आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतल्यास युवक देशाच्या भविष्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात. 'युवा जोडो संकल्प अभियान' राज्यभर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन करत २०२९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष राज्य आणि देशाच्या सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रल्हाद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनीताताई किरवे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.