माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चौकशी समिती' गठीत,

👤 अतुल फसाले | 📅 19 June 2026 | 👁 22 Views
माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चौकशी समिती' गठीत,
सोलापूर दि.18 - दिनांक 14 जून 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनाहून परतत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात भीषण अपघात झाला. हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत कोसळल्याने 8 निष्पाप नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांनी या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी 'विशेष चौकशी समिती गठीत केली आहे.

तसेच, भविष्यात अशा दुर्देवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या, संरक्षक भिंत नसलेल्या धोकादायक व उघड्या विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 'तालुकास्तरीय समिती देखील गठीत करण्यात आली आहे.
अपघाताच्या चौकशीसाठी विशेष समितीः
तांदुळवाडी येथील विहीर अपघात नेमका कशामुळे झाला, यामध्ये रस्ते रचनेतील त्रुटी, वाहनाचा वेग की अन्य काही तांत्रिक कारणे कारणीभूत होती, याचा सखोल तपास ही समिती करणार आहे. ही समिती आपला अहवाल जिल्हा रस्ते सुरक्षा समितीला सादर करेल, ज्याच्या आधारे पुढील कायदेशीर व सुधारात्मक कारवाई केली जाईल.
धोकादायक विहिरीच्या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरीय समितीः
जिल्ह्यातील महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांच्या कडेला अनेक विहिरींना संरक्षक भिंती (कठडे) किंवा जाळ्या नसल्याने त्या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. यावर तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी तालुका पातळीवर समिती गठीत करण्यात आली असून, त्यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेतः
तात्काळ सर्वेक्षणः तालुक्यातील सर्व रस्त्यांच्या कडेला असलेल्या आणि संरक्षक भिंत नसलेल्या उघड्या, धोकादायक विहिरीचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करणे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनाः संबंधित विहीर मालकांना किंवा प्राधिकरणाला तात्काळ संरक्षक भिंत (Parapet Wall) बांधणे, लोखंडी जाळ्या बसवणे किंवा रिफ्लेक्टर्स/धोकादायक फलक लावण्याचे आदेश देणे.
कडक अंमलबजावणी व कारवाई: आदेश देऊनही विहिरी सुरक्षित न करणाऱ्या निष्काळजी मालमत्ता धारकांवर कायदेशीर कारवाई करणे.
"माळशिरस येथील अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. मृत नागरिकांच्या कुटुंबांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. या घटनेची निष्पक्ष चौकशी केली जाईल. तसेच, जिल्ह्यातील एकही उघडी विहीर रस्त्याच्या कडेला असुरक्षित राहणार नाही, यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेला युद्धपातळीवर सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या जिवाची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे."
अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी, अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे; टेंडरबाह्य साहित्य वापरल्याचा आरोप , मृदा व जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष | पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत | शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व शिक्षण विभागाचा जिल्हाभर जल्लोषमय दौरा; विद्यार्थ्यांच्या स्वागताने दुमदुमल्या जिल्हा परिषद शाळा | डाळिंबाच्या ‘कॅलिफोर्निया’ची यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकात; राज्यभर गाजले अजनाळे | आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत | आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी | माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चौकशी समिती' गठीत, | "वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश |