आटपाडी, दि. 28 एप्रिल 2026
आटपाडी तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजता नागरिक कामानिमित्त कार्यालयात आले असता, बहुतांश कर्मचारी आपल्या जागेवर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. दुपारी सुमारे 2.45 वाजेपर्यंतही अनेक कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून "सर्व्हर डाऊन" असल्याचे कारण देण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांची कामे दिवसेंदिवस रखडत असल्याचे चित्र आहे. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केलेल्या एका प्रकरणाला आजपर्यंत मंजुरी मिळालेली नाही. विशेष म्हणजे हे प्रकरण 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सौ. यशोदा बापू कोळी यांचे असून, त्यांचा दाखला संबंधित अधिकारी वाघमोडे मॅडम यांच्या टेबलवर प्रलंबित आहे.
दिनांक 20 एप्रिल रोजी चौकशी केली असता "सर्व्हर डाऊन" असल्याचे सांगून अर्जदाराला परत पाठवण्यात आले, तसेच दाखला मिळण्यास 15 दिवसांची मुदत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरण असल्याने तत्परतेने कार्यवाही होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शासन स्तरावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक देण्यासाठी विविध योजना आणि नियम लागू करण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे “शासनाच्या योजना केवळ कागदावरच मर्यादित आहेत का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून प्रशासनात शिस्त आणावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच मा. मुख्यमंत्री, मानव अधिकार आयोग व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.