आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीची आस घेऊन वारकरी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मार्गक्रमण करीत असतात. आषाढी एकादशी आणि दिंडी ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि परंपरा दर्शविते. पंढरपूरच्या वाटेने जाणारी अशीच एक दिंडी कराड तालुक्यातील कोळे येथून प्रस्थान करते. संतश्री गाडगेनाथ महाराज यांची ही दिंडी कराड, खटाव, माण या तालुक्यातून प्रवास करून पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. १७७ वर्षांपासूनचा दिंडीचा मार्ग तोच आहे. खटाव तालुक्यातून माण तालुक्यात प्रवेश करताना ही दिंडी आगासवाडी च्या डोंगरावर येते. इथे संत गाडगेनाथ महाराजांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी रिंगण झाल्यानंतर सुरू होतो पालखीचा खडतर प्रवास, इथून पुढे पालखी कुलकर्णी यांच्या खोऱ्यात उतरते. हा प्रवास मुंगी घाटासारखा थरार अनुभवते. अवघड आणि चिंचोळ्या मार्गाने पाऊलवाटेने ही पालखी खाली उतरते. या पालखीचा हा प्रवास श्वास रोखून धरणारा आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गासाठी प्रयत्न झाले होते ज्यामध्ये कुकुडवाड ते आगासवाडी रस्त्यासाठी रोजगार हमी योजनेतून रस्ता करण्यास सुरुवातही झाली होती. पण कालांतराने वनविभागामुळे काम थांबले. पण संत श्री गाडगेनाथ महाराजांची पालखी अविरत याच खडतर मार्गाने प्रवास करीत आहे. या पालखीचे चालक व संत गाडगेनाथ महाराजांचे थेट वंशज कृष्णत महाराज कोळेकर यांनी हा रस्ता व्हावा ही आमची प्रशासनाकडे विनंती असल्याचे सांगितले तर. भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी या रस्त्यासाठी नक्की प्रयत्न करू असे सांगितले. हा रस्ता झाला तर दक्षिणपूर्व माण तालुका आणि खटाव तालुका यांना जोडणारे अंतर जवळपास 20 किलोमीटर ने कमी होईल. सोबत माण तालुका असूनसुद्धा माण तालुक्याशी संपर्क तुटलेले आगसवाडी सुद्धा या रस्त्यामुळे कुकुडवाड आणि माण तालुक्याशी जोडले जाईल असे मत म्हस्करवाडी कुकुडवाड येथील प्रकाश शेठ सूर्यवंशी यांनी व्यक्त केले
एकंदरीत या पालखी मार्गाचे काम झाल्यास श्री संत गाडगेनाथ महाराज यांची पंढरपूर जाणारी दिंडी तर सुखकर होईलच पण परिसरातील जवळपास 16 गावाना या रस्त्याचा लाभ होईल