महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शनिवारी होणाऱ्या सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवस्थानाच्या आवारात टेंभू सिंचन प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.या बैठकीस कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, आरेवाडी, रायवाडी, लंगरपेठ, ढालगाव, नागज, केरेवाडी, आगळगाव, दुधेभावी, चुडेखिंडी, घोरपडी, शिंदेवाडी, निमज तसेच जत तालुक्यातील टेंभू सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांतील शेतकरी, विविध गावांचे प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत टेंभू सिंचन प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित कामे, सिंचनासाठी पाणी उपलब्धता, कालव्यांची अपूर्ण कामे, पाणी वितरण व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, शनिवारी होणाऱ्या जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान टेंभू प्रकल्पाशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि प्रकल्पाची कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबतही चर्चा झाली.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी टेंभू प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनासाठी नियमित पाणी मिळावे, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण व्हावीत आणि प्रकल्पाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीमुळे टेंभू सिंचन प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असून, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शनिवारी होणाऱ्या सांगली दौऱ्यात प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होतील, अशी आशा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.