महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकृत दस्तऐवजांनुसार, १ एप्रिल २०२६ पर्यंत महामंडळात मंजूर असलेल्या एकूण ६८१ पदांपैकी तब्बल ३५३ पदे रिक्त आहेत, तर केवळ ३२८ पदांवर नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त पदांचे हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असल्याने महाबीजचा कारभार रामभरोसे चालला असून कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे.
गटनिहाय रिक्त पदांची स्थिती:
समोर आलेल्या माहितीनुसार, 'अ' ते 'ड' या सर्वच गटांमध्ये रिक्त जागांची संख्या लक्षणीय आहे:
गट 'अ': एकूण ६० मंजूर पदांपैकी ३९ पदे भरलेली असून २१ पदे रिक्त आहेत. यामध्ये उपमहाव्यवस्थापक (प्रक्रिया व वित्त), विभागीय व्यवस्थापक (गु.नि.), जिल्हा व्यवस्थापक (ऊती संवर्धन), वरिष्ठ पैदासकार, वरिष्ठ कृषि अभियंता आणि संगणक व्यवस्थापक यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
गट 'ब': सर्वाधिक फटका 'ब' गटाला बसला असून २४२ मंजूर पदांपैकी केवळ ११९ पदे भरलेली आहेत, तर १२३ पदे रिक्त आहेत. विशेषतः कृषि क्षेत्र अधिकारी (९६ पदे रिक्त), कनिष्ठ अभियंता व कनिष्ठ केंद्र अभियंता या तांत्रिक पदांवरही नियुक्ती प्रलंबित आहे.
गट 'क': १६७ मंजूर पदांपैकी ७८ पदे भरलेली असून ८९ पदे रिक्त आहेत. यात लिपिक-टंकलेखक (४७ पदे रिक्त) आणि लघुलेखक या पदांचा समावेश आहे.
गट 'ड': २१२ मंजूर पदांपैकी ९२ पदे भरलेली असून १२० पदे रिक्त आहेत. यामध्ये कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक (४२ पदे), कनिष्ठ यंत्रचालक (२७ पदे) आणि शिपाई-पहारेकरी (४८ पदे) अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
अधिसंख्य पदांची स्थिती:
सध्या महामंडळात नियमित ३२८ कर्मचाऱ्यांशिवाय ५ कर्मचारी अधिसंख्य (Supernumerary) पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखक (१), कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक (२), कनिष्ठ यंत्रचालक (१) आणि शिपाई-पहारेकरी (१) यांचा समावेश असून एकूण कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या ३३३ वर पोहोचते.
शेतकऱ्यांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता
महाबीज ही राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे पुरवणारी अग्रगण्य संस्था आहे. मात्र, क्षेत्रीय स्तरावर काम करणारे 'कृषि क्षेत्र अधिकारी' आणि प्रक्रिया केंद्रांवरील तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने महामंडळाच्या उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रिक्त जागांची ही मेगाभरती तातडीने न झाल्यास आगामी खरिप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे पुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शासनाने या भरतीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.