ईश्वरपूर, दि. 28 जून 2026 शहराचा मुख्य चौक असलेला यल्लमा चौक मंदिर परिसर सध्या बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनला आहे. भाजी मार्केटचे नूतनीकरण सुरू असल्याने रविवारचा बाजार रस्त्यावर भरत असून, प्रशासनाने वाहतूक व पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिक व दुकानदार प्रचंड त्रस्त झाले आहेत.आज रविवार बाजारचा दिवस असल्याने यल्लमा चौक ते कचेरी रोडवर मोठ्या प्रमाणात बाजार भरला होता. ईश्वरपूर शहर, उपनगर व आजूबाजूच्या खेड्यांमधून व्यापारी, शेतकरी,तसेच नागरिक खरेदी विक्री साठी येतात. मात्र पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने लोक कुठेही, कशाही गाड्या लावत आहेत. दुकानांसमोर गाड्या लागल्याने ग्राहकांना आत यायला अडचण होत आहे त्यामुळे वाहनधारक व दुकानदारांमध्ये बरेचदा वाद होत आहे यल्लमा देवीचा भक्त परिवार खूप मोठा आहे मुख्य चौकात असणाऱ्या या मंदिरासमोरच गाड्या पार्क केल्याने दर्शनास येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे.तसेच गांधी चौक आणि मार्केट यार्ड कडून येणाऱ्या वाहनांना रस्ताच मिळत नाही त्यामुळे भाजी मार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने बाजारासाठी येणाऱ्या लोकांना तात्पुरती पर्यायी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. वाहतुकीला व पार्किंगला शिस्त लावून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
---