आटपाडी शहरातील साठेनगर परिसरातील गोरगरीब, उपेक्षित व वंचित घटकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, मालकी हक्कासह ७/१२ उतारा व प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, तसेच २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करून महसूल मंत्री यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी साठेनगर ग्रामस्थांनी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, औंध संस्थान काळापासून साठेनगरमध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, जागा शासनाच्या नावावर असल्याने अनेक पात्र नागरिक आजही घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभर साठेनगरमध्ये नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. शासनाने २०११ पूर्वीच्या १,५०० चौ. फूटपर्यंतच्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने राबवून सर्व पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी युवा नेते नाथा लांडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप लांडगे, विष्णू लांडगे, बबन लांडगे, अशोक लांडगे, प्रेम नाईकनवरे, संजय लांडगे (मिस्त्री), दुर्गेश लांडगे, रोहित लांडगे, सुनील लोखंडे, संजय वाघमारे यांच्यासह साठेनगरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष यू. टी. जाधव व गटनेते नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने आटपाडी शहरातील या योजनेस पात्र ठरणाऱ्या नागरिकांसाठी 'जनता दरबार' आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.