दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात*
महेश व ओमकार सानप यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण गाव एकवटले
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तिगाव गावातील सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले.
तिगाव येथील कै. चि. महेश गोरखनाथ सानप (वय १८) व कै. चि. ओमकार गोरखनाथ सानप (वय १४) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत असताना सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी सानप कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला.
"एकच ध्यास तिगावचा विकास" या सामाजिक समूहाच्या माध्यमातून ग्रामस्थ, युवक व विविध स्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मदत निधी संकलित केला. या उपक्रमातून तब्बल ₹1 लाख 83 हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली.
संकलित मदतीचा धनादेश आज तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर किसन सानप यांच्या हस्ते तसेच गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुलांच्या मातोश्री मनिषा गोरक्ष सानप यांना सुपूर्त करण्यात आला.
यावेळी सानप कुटुंबीय, ग्रामस्थ, युवक वर्ग तसेच गावातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी दिवंगत महेश व ओमकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांना धीर दिला.
तिगाव ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट, सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचा हा आदर्श उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून, संकटाच्या काळात गाव एक कुटुंब म्हणून उभे राहते याची प्रचिती पुन्हा एकदा आली. यावेळी मंत्रालय मिडिया पत्रकार संकेत तुकाराम सानप यांनी संपूर्ण सानप कुटुंबाच्या वतीने गावकरी व मदत करणारे सर्वांचे आभार मानले