पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प स्वीकारणार नाही; प्रथम माहिती, मगच भूमिका ठरवू
देवगड : देवगड तालुक्यात प्रस्तावित प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसताना काही व्यक्तींकडून ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला. देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विषयावर शासनाची भूमिका स्पष्ट करत विकासविरोधी शक्तींना थेट इशारा दिला.
राणे म्हणाले की, देवगडमध्ये नेमका कोणता प्रकल्प प्रस्तावित आहे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याचा पर्यावरणावर किंवा स्थानिकांवर काय परिणाम होणार आहे, याबाबत जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनाही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र काही व्यक्ती गावोगावी बैठका घेऊन अंबा, काजू बागायती नष्ट होतील, परिसर उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत.
प्रकल्पाची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर संबंधित अधिकारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांना एकत्र बसवून सादरीकरण केले जाईल. त्यानंतरच पुढील भूमिका निश्चित केली जाईल. माहिती नसताना जनतेला भडकवणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोकण आणि सिंधुदुर्गच्या पर्यावरणाबाबत शासन अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगताना राणे म्हणाले की, पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकारणार नाहीत. मात्र रोजगारनिर्मिती, उद्योग आणि स्थानिक विकासाला चालना देणारे प्रकल्प जिल्ह्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
देवगड आणि सिंधुदुर्गमधील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थलांतर कमी व्हावे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळावे यासाठी विविध प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखतच विकास साधला जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बाहेरील काही शक्ती विकासकामांना विरोध करण्यासाठी कोकणात सक्रिय झाल्याचा आरोप करत अशा घटकांमुळे देवगडचे वातावरण बिघडू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेसमोर जबाबदार आहोत. ग्रामस्थांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.