महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांप्रती असलेल्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवेमुळे सुरक्षारक्षक शेख समी यांचा नुकताच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या हस्ते शेख समी यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला असून एसटी कर्मचारी व प्रवाशांकडून त्यांचे कौतुक होत आहे.शेख समी यांनी आपल्या सेवाकाळात अनेक वेळा एसटी बसस्थानक परिसरात तसेच बसमध्ये प्रवाशांकडून हरवलेल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल फोन, दागिने, रोख रक्कम असलेल्या पर्स व इतर साहित्य प्रामाणिकपणे शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून एसटी प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आजच्या काळात हरवलेल्या वस्तू परत मिळण्याची शक्यता कमी असताना शेख समी यांनी दाखविलेली प्रामाणिकता आणि सेवाभाव हे इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करणे, हरवलेल्या वस्तूंची माहिती नोंदवून त्यांचा योग्य मालक शोधणे आणि त्या सुरक्षितपणे परत करणे या त्यांच्या कार्यामुळे त्यांना प्रवाशांचे विशेष प्रेम मिळाले आहे. सत्कार कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेख समी यांच्या कार्याचे कौतुक करताना प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सेवाभाव यांचे उत्तम उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले असल्याचे सांगितले. एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून प्रवाशांच्या विश्वासाची जबाबदारी असल्याचे नमूद करत अशा कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची प्रतिमा उंचावते, असे गौरवोद्गार काढण्यात आले.
यावेळी शेख समी यांनी मिळालेला सन्मान हा माझ्यासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही प्रवाशांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक तत्परतेने कार्य करत राहणार असल्याची भावना सुरक्षा रक्षक शेख समी यांनी व्यक्त केली. प्रवाशांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू योग्य मालकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य आणि निस्वार्थ सेवाभावामुळे सुरक्षारक्षक शेख समी यांचा झालेला गौरव हा संपूर्ण एसटी परिवारासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या गौरव कार्यक्रमा प्रसंगी आगार व्यवस्थापक शेख समी,घुगे व शिपाई लाटे आदींची उपस्थिती होती.