"महावितरणने जनतेच्या या रास्त आणि न्याय्य मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हे लोडशेडिंग त्वरित थांबवावे. जर यावर प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आम्हाला जनतेच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल.
श्री. शरद दडस (सरसरचिटणीस, राष्ट्रीय समाज पक्ष,)
माण तालुक्यातील मोगराळे आणि शिंगणापूर फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगमुळे ग्रामीण जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत होणारी ही वीज कपात त्वरित बंद करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरसरचिटणीस श्री. शरद दडस यांनी थेट मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात ग्रामीण भागातील नागरिकांच्या अत्यंत गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय चालतो. संध्याकाळच्या वेळी गाई-म्हशींची धार काढण्यासाठी सध्या आधुनिक मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. मात्र, नेमक्या याच वेळेत वीज गायब राहत असल्याने ज्यांच्याकडे जास्त जनावरे आहेत, त्यांना हाताने धार काढणे अशक्य बनले आहे. परिणामी, दूध वेळेवर संकलन केंद्रात पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, हाच काळ शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मुख्य वेळ आहे. रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे अंधारात अभ्यास कसा करावा? असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळा संपून पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने ग्रामीण भागात साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागोपाठ चार तास वीज गायब राहत असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडून जाते, ज्यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महिलांनाही अंधारात घरगुती कामे व स्वयंपाक करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रासपच्या प्रमुख मागण्या मोगराळे व शिंगणापूर फिडरवरील संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० या वेळेतील अघोषित लोडशेडिंग त्वरित व पूर्णपणे बंद करण्यात यावे.जर काही तांत्रिक कारणांमुळे वीज कपात करणे अपरिहार्य असेल, तर ती रात्रीच्या वेळी न करता दुपारी किंवा इतर सवडीच्या वेळेत विभागून करावी. या दोन्ही फिडरवर कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा बहाल करण्यात यावा.