कोयना धरणातील मर्यादित पाणीसाठा पाहता, उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत गुरुवार, दिनांक ४ जून २०२६ रोजीच्या मध्यरात्री ०० वाजल्यापासून ते रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजीच्या २४ वाजेपर्यंत शेतीसाठीचा खाजगी उपसा आणि औद्योगिक कारणांसाठीचा (बिगर सिंचन) पाणी उपसा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ११ व ४९ मधील तरतुदीनुसार हे उपसा बंदी आदेश निर्गमित केले आहेत.
नियम मोडल्यास वीज जोडणी तोडणार, साहित्यही जप्त करणार!
या चार दिवसांच्या उपसा बंदी कालावधीत केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांनाच सवलत देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी किंवा व्यावसायिक कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास तो पूर्णपणे अनधिकृत मानला जाईल.
कडक कारवाईचा इशारा: नियमभंग करणाऱ्या संबंधितांचा पाणी परवाना आणि विद्युत पुरवठा थेट एका वर्षासाठी रद्द करण्यात येईल. तसेच, नदीपात्रातील उपसा संच व इतर साहित्य (मोटारी/पंप) जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नदीप्रदूषण करणाऱ्यांवर राहणार नजर
धरणात सध्या मर्यादित पाणीसाठा असल्याने प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडणे शक्य नाही. त्यामुळे बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी किंवा उद्योगांनी आपले सांडपाणी अथवा रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडून पाणी दूषित करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. सर्वांनी पाणी टंचाईची तीव्रता ओळखून पाणीनाश टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
८ जूनपासून पाणी उपसा पुन्हा सुरू होणार
शेतकरी आणि पाणी वापरकर्त्यांना काहीसा दिलासा देत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा बंदी कार्यकाळ संपल्यानंतर सोमवार, दिनांक ८ जून २०२६ रोजीच्या मध्यरात्री ०० वाजल्यापासून ते गुरुवार, दिनांक ११ जून २०२६ रोजीच्या २४ वाजेपर्यंत पाणी उपसा पुन्हा पूर्ववत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.