सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने रविवारी (दि. ३१) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व ब संयुक्त पूर्व परीक्षेत यंदा प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वाढल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः जनरल स्टडीच्या पेपरमधील इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडींवरील प्रश्नांनी उमेदवारांचा चांगलाच कस लावला. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर अधिक विश्लेषणात्मक होत असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
पहिल्या सत्रातील जनरल स्टडीच्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्नांसोबतच संकल्पनात्मक आणि सखोल अभ्यासाची गरज भासणारे प्रश्न विचारण्यात आले. इतिहास व भूगोलातील प्रश्नांचे स्वरूप तुलनेने कठीण असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करताना अडचणी आल्या. करंट अफेअर्सवरील प्रश्नही सखोल स्वरूपाचे असल्याने केवळ पाठांतरावर भर देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसल्याचे दिसून आले.
मात्र, दुसऱ्या सत्रातील सीसॅट (CSAT) पेपर विद्यार्थ्यांसाठी तुलनेने दिलासादायक ठरला. पॅसेज, तर्कशक्ती आणि अंकगणितावरील प्रश्न अपेक्षेपेक्षा सोपे असल्याने विद्यार्थ्यांनी हा पेपर सहज सोडविल्याचे सांगितले.
दरम्यान, परीक्षेला अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण यंदाही लक्षणीय राहिले. आयोगाच्या आकडेवारीनुसार, परीक्षेसाठी एकूण ९ हजार ४२७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, सकाळच्या सत्रात ३ हजार ३४ आणि दुपारच्या सत्रात ३ हजार १४५ उमेदवार गैरहजर राहिले. म्हणजेच जवळपास ३३ टक्के उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, वाढती स्पर्धा आणि बदलते प्रश्नपत्रिका स्वरूप लक्षात घेता विद्यार्थ्यांनी केवळ तथ्याधारित अभ्यास न करता विश्लेषणात्मक तयारीवर भर देणे आवश्यक आहे. यंदाच्या परीक्षेने एमपीएससीच्या तयारीचा नवा मापदंड निश्चित केल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे.