संगमनेर प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील समनापुर-निमोण गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत येत आहेत. यामध्ये कविता कैलास पाटील यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू असून, स्थानिक पातळीवर त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे कविता पाटील यांनी गटातील नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध गावांमध्ये सातत्याने संपर्क ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
समनापुर-निमोण गटात महिला नेतृत्वाला वाढती पसंती मिळत असून, कविता पाटील यांचे नाव याच पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत आले आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडल्याने अनेक कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
स्थानिक नागरिक, महिला वर्ग आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अधिकृत उमेदवारीबाबत कोणतीही घोषणा झालेली नसली तरी समनापुर-निमोण गटात कविता कैलास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी काळात राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.