तळेगाव दिघे : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “ऊस विकास मेळावा” आज तळेगाव दिघे येथील महाराजा लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत ऊस उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
मेळाव्यात डॉ. समाधान सुरवसे यांनी माती परीक्षण, पोषण व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अशोक जगताप यांनी सुधारित ऊस वाण, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींची माहिती दिली.
यावेळी बोलताना, ऊस शेती अधिक समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे ध्येय ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून कारखान्याचे गाळप १५ लाख टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. स्वतःचा १५ लाख टन ऊस उभा राहिल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
साखर कारखाना हा केवळ उद्योग नसून तालुक्याच्या अर्थकारणाला गती देणारे हृदय असल्याचे मत व्यक्त करताना, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या प्रगतीशी कारखान्याचे अतूट नाते असल्याचे अधोरेखित करण्यात आले. बाजारपेठेला बळकटी देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, ही कारखान्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात आले.
“शेतकरी समृद्ध झाला तर कारखाना सक्षम होईल आणि कारखाना सक्षम झाला तर संपूर्ण तालुक्याची प्रगती अधिक वेगाने होईल,” या विश्वासातून आयोजित करण्यात आलेला हा ऊस विकास मेळावा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.