संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील विविध गावांना जोडणारा तसेच काकडवाडी हद्दीतील महत्त्वाचा पालखी मार्ग अखेर दुरुस्तीच्या कामामुळे चर्चेत आला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेली रस्ता दुरुस्ती व साईड पट्ट्या बुजविण्याच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल गायकवाड यांच्याकडे पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी निवेदनाद्वारे सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पालखी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः आषाढी वारीच्या काळात या मार्गावरून लाखो वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात सहभागी होत पायी प्रवास करत असतात. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने या प्रश्नाला वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाने रस्ता दुरुस्ती तसेच साईड पट्ट्या बुजविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, वारकरी आणि वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पालखी मार्गाचे डांबरीकरण आणि कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या या पाठपुराव्याला विविध वर्तमानपत्रे, वेब पोर्टल आणि यूट्यूब माध्यमांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.