गजबजलेली गावे पुन्हा ओस; रेल्वे, एसटी आणि खासगी बसस्थानकांवर गर्दी
मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त आपल्या मूळ गावी आलेले चाकरमानी आता पुन्हा मुंबई, पुणे तसेच इतर शहरांच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रेल्वे, एसटी बस तसेच खासगी आराम बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी रवाना होत असल्याने स्थानकांवर गर्दीचे चित्र दिसून येत आहे. गेले दीड महिना चाकरमान्यांच्या उपस्थितीने गजबजून गेलेली वैभववाडी तालुक्यातील गावे आता पुन्हा शांत आणि ओस पडू लागली आहेत.वैभववाडी तालुक्यातील अनेक कुटुंबे रोजगार, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, ठाणे तसेच इतर महानगरांमध्ये स्थायिक झाली आहेत. त्यामुळे गावातील अनेक घरे वर्षातील बहुतांश काळ बंद अवस्थेत असतात. गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि मे महिन्याच्या सुट्टया हेच काळ गावांना पुन्हा एकदा जीवंतपणा देणारे ठरतात. काही घरांमध्ये फक्त वृद्ध आई-वडील राहत असल्याने चाकरमान्यांच्या आगमनाची ते वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.
मे महिन्यात सुट्टी मिळताच चाकरमानी आपल्या कुटुंबीयांसह
कणकवली : मुंबईला परतण्यासाठी खाजगी गाड्यांच्या वाहनतळावर झालेली प्रवाशांची गर्दी.
चाकरमान्यांनी लुटला रानमेव्याचा आनंद
लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनीही रानमेवा गावठी आंबे, करवंदे, जांभूळ यासारख्या रान मेव्याचा आस्वाद घेतला. त्याचप्रमाणे तालुक्यातील अरुणा प्रकल्पामुळे अरुणा नदी, तरी कुर्सी धरणामुळे शिवगंगा नदी वाहत असून या नदीत पोहण्याचा आनंदही लहान थोरांनी लुटल्याचे पाहायला मिळाले.
गावाकडे दाखल झाले होते. या काळात गावागावांत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सत्यनारायणाच्या महापूजा, लासमारंभ, जयंती उत्सव, क्रिकेट
स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामदैवतांच्या यात्रांमुळे ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांनीही गावातील निसर्गरम्य वातावरण, आंबा-काजू बागा, नदी-ओढे आणि पारंपरिक
खेळांचा आनंद घेतला,
चाकरमान्यांच्या आगमनामुळे ग्रामीण बाजारपेठांनाही चांगलीच चालना मिळाली होती. किराणा दुकाने, हॉटेल्स, फळ विक्रेते, कोकणी मेवा, कपड्यांची दुकाने तसेच वाहन व्यवसायिकांकडे ग्राहकांची वर्दळ वाढली होती. अनेकांनी घरांची दुरुस्ती, रंगकाम तसेच शेतीसंबंधित कामेही या काळात उरकून घेतली.
मात्र आता सुट्ट्या संपल्याने चाकरमानी पुन्हा शहरांकडे रवाना होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तसेच बसस्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. आरक्षण मिळत नसल्याने अनेक जण खासगी आराम बसांचा पर्याय निवडत आहेत. गाव सोडताना अनेकांच्या डोळ्यांत भावनिक क्षणही पाहायला मिळत आहेत. वृद्ध पालकांचा निरोप घेताना वातावरण हळवे होत असून "पुन्हा गणपतीला भेटू" असे आश्वासन देत चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
मे महिनाभर गजबजलेल्या गावांमध्ये आता पुन्हा शांतता पसरू लागली असून चाकरमान्यांच्या पुढील आगमनाची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागून राहिली आहे.