आटपाडी तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून डाळिंब बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून एक घोडा, एक म्हैस व एक गाय मृत्यूमुखी पडली आहे. तसेच अनेक घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी आज नुकसानग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तालुक्यातील विविध गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक डाळिंब बागांतील फळे झाडावरून गळून पडली असून झाडांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जोपासलेले पीक काही तासांच्या पावसात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरे जखमी झाली आहेत. पाहणी दरम्यान आमदार सुहास बाबर यांनी महसूल, कृषी, पशुसंवर्धन व वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच पडलेले वीज खांब त्वरित उभारून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, “अचानक झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून जनावरांचेही नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी. प्रशासनाने जलदगतीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.”