संगमनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला अखेर गती मिळाली असून, २१ गावांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने तसेच आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना अखेर कार्यान्वित झाली आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही परिसरातील हजारो नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरणारी योजना मानली जाते. मागील काही काळापासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे या योजनेचे काम रखडले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि प्रशासनाच्या समन्वयातून अखेर या योजनेतून जलप्रवाह सुरू करण्यात आला.
निंबाळे शिवारातील प्रवरा नदीकाठच्या पंपिंग स्टेशनमधून वडगाव पान येथील साठवण तलावाकडे पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे तळेगावसह परिसरातील २१ गावांच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक गावांमध्ये आता नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत योजनेची पाहणी करण्यात आली. कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये, नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा आणि भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. “दिलेला शब्द पाळत लोकांच्या पाणी प्रश्नासाठी प्रभावी काम करण्यात आले,” अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नसून ग्रामीण भागातील शेती, जनावरे आणि दैनंदिन जीवनालाही मोठा आधार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.