सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'सैनिक रत्न पुरस्कार २०२६' माण तालुक्यातील मरगळवाडी (वळई) चे सुपुत्र माजी सैनिक नायब सुभेदार पोपट सिताराम शिंगाडे यांना जाहीर झाला आहे.
कारगिल युद्धासह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. भारतीय सैन्यात 'द बिहार रेजिमेंट'च्या विविध प्रतिष्ठित युनिट्समध्ये तब्बल १८ वर्षे ६ महिने सेवा बजावली. या सेवाकाळात त्यांनी ऑपरेशन विजय (कारगिल युद्ध), ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन सुरक्षा, ऑपरेशन रायनो आणि CIOPS यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण देशसंरक्षण मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शिस्त, धैर्य आणि असीम राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवत त्यांनी देशाच्या विविध भागांत शौर्याने सेवा केली.
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत प्रवेश केला. तहसील कार्यालय वेल्हे, सातारा कोरेगाव, फलटण येथे सेवा केली. दहिवडी येथे पुरवठा अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी १६ वर्षे लोकसेवेचा वसा प्रामाणिकपणे चालवला. विशेषतः कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेळेवर धान्य व जीवनावश्यक मदत पोहोचवली. त्यांच्याच कार्यकाळात १३९ शासकीय रेशन दुकाने, २ गोडाऊन आणि कार्यालयाला ISO 2009 व ISO 2015 मानांकन प्राप्त झाले.
त्यांच्या या कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त (पुणे) आणि जिल्हाधिकारी सातारा यांच्या हस्ते त्यांना "कोरोना योद्धा" म्हणून गौरविण्यात आले होते. तसेच, नवी दिल्ली येथील काली रमण फाउंडेशनतर्फे त्यांना "भारत गौरव पुरस्कार" देऊनही सन्मानित करण्यात आले आहे.
३० जून २०२५ रोजी नागरी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिंगाडे यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित (आयटी इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर आणि एमबीबीएस डॉक्टर) करून देशाचे जबाबदार नागरिक म्हणून घडवले आहे.पोपट शिंगाडे यांना 'सैनिक रत्न' जाहीर झाल्याबद्दल माण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.