सेतू कार्यालयात कायमच नागरिकांना लुटले जाते , गावातील दिलेल्या महा ई सेवा केंद्राकडून काढलेले दाखले मुद्दाम सोडले जात नाही . त्यांना दिवसांचा नियम दाखवला जातो, नियम सेतू चालकाचा लागू होत नाही का ? सेतू कार्यालयात काही तासात मिळतो दाखला.ग्रामीण भागातील नागरिकांनी तहसील सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी यावे साठी अडवणूक केली जाते .
मलेशिम कामपुरी
स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, राज्य उपाध्यक्ष
शासनाने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सांगोला येथील अधिकृत सेतू केंद्र अनेक वेळा रिकामे दिसत असून, विद्यार्थ्यां व नागरिक यांची खाजगी गाळ्यात कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.विशेषतः शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, जातीचे, निवासी तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र अधिकृत केंद्रात सेवा न देता काही कर्मचाऱ्यांकडून खाजगी ठिकाणी अर्ज भरून घेणे, अतिरिक्त पैसे आकारणे आणि तातडीच्या कामासाठी जादा शुल्क मागितले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असून पावतीही दिली जात नाही. काही वेळा “सर्व्हर बंद आहे” किंवा “काम ऑनलाइन होत नाही” अशी कारणे देत नागरिकांना बाहेरील गाळ्याकडे पाठवले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, अधिकृत सेतू केंद्रात पुरेशा सुविधा नसणे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन न मिळणे यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच शासनाने निश्चित केलेल्या शुल्कानुसारच सेवा देण्यात यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.सांगोला येथील या प्रकारामुळे सेतू कार्यालयातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.