"हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून, मला सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा प्रेरणा पुरस्कार मला भविष्यात आणखी जोमाने आणि प्रामाणिकपणे सामाजिक काम करण्याची ऊर्जा देईल.
— सौ. राजश्री तानाजी जाधव (पुरस्कार विजेत्या)
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखलनामांकित सामाजिक कार्यकर्त्या आणि 'ERCF कमांडो फोर्स'च्या सक्रिय कमांडो सौ. राजश्रीताई तानाजी जाधव यांना बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६' ने गौरवण्यात आले. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे खटाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बेळगाव येथील भव्य सभागृहात 'डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड फाउंडेशन', 'सर्किट बेंच फाउंडेशन', आणि 'शांतीदूत परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने 'नॅशनल पोएट्री कॉन्फरन्स आणि राष्ट्रीय पुरस्कार सोहळा' (९८ वे संमेलन) मोठ्या उत्साहात पार पडला. हा संपूर्ण सोहळा 'इंडियन पोलीस मित्र भारत' आणि 'विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन' यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापित करण्यात आला होता.
या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्याला विविध राज्यांतून आलेले प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, प्राध्यापक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुरेश राठोड, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) डॉ. विठ्ठल जाधव आणि संचालक डॉ. गुंडोपंत सुतार या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. राजश्री जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात, तसेच समाज बांधणी व लोककल्याणकारी कामांमध्ये दिलेल्या निस्वार्थी आणि बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), राष्ट्रीय सन्मान प्रमाणपत्र, पारंपरिक शाल, श्रीफळ आणि फेटा परिधान करून अत्यंत गौरवाने सन्मानित करण्यात आले.