माण तालुक्यात परिवर्तनाची नवी लाट निर्माण करून ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, जबाबदार आणि जनतेच्या विश्वासावर आधारित प्रशासन उभे करण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला आहे.
— सोहम शिर्के
जिल्हाउपाध्यक्ष व प्रवक्ता, आम आदमी पार्टी, सातारा
माण तालुक्यातील येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील पारंपरिक राजकारणाला सक्षम, पारदर्शक आणि जनतेच्या विश्वासावर आधारित पर्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी (आप) तर्फे तिसरी आघाडी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सोहम शिर्के (जिल्हाउपाध्यक्ष व प्रवक्ता, आम आदमी पार्टी, सातारा) यांनी दिली.गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित राहिले असून, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. जलजीवन मिशन, नळपाणी योजना, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामरस्ते विकास, पथदिवे व्यवस्था, जलसंधारण व पाणी अडवा-पाणी जिरवा उपक्रम, शौचालय योजना, घरकुल योजना, तसेच विविध विकास निधीअंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये अनेक ठिकाणी अनियमितता, निधीचा अपव्यय आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने समोर येत आहेत.
अनेक ग्रामपंचायतींमध्ये नियमित ग्रामसभा घेतल्या जात नाहीत, ग्रामस्थांना विकासकामांचा व खर्चाचा स्पष्ट हिशोब दिला जात नाही, तसेच काही ठिकाणी खोटी बिले काढून निधीचा अपहार होत असल्यामुळे गावकऱ्यांचा स्थानिक प्रशासनावरील विश्वास कमी होत चालला आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था असताना, जनतेचा सहभाग कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याबाबत बोलताना सोहम शिर्के म्हणाले, “गाव बदलायचे असेल, तर राजकारणाची दिशा बदलावी लागेल. ग्रामपंचायतीत पूर्ण पारदर्शकता, नियमित ग्रामसभा, प्रत्येक खर्चाचा जनतेसमोर खुला हिशोब आणि प्रत्येक शासकीय योजनेची प्रामाणिक अंमलबजावणी झाली पाहिजे. ग्रामस्थांच्या पैशाचा आणि हक्काचा योग्य उपयोग झाला पाहिजे. यासाठी स्वच्छ, प्रामाणिक आणि जबाबदार नेतृत्व उभे करणे काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, आम आदमी पार्टीच्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येईल. तरुणांना नेतृत्वाच्या संधी, महिलांचा सक्रिय सहभाग, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना प्राधान्य, तसेच पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, डिजिटल ग्रामव्यवस्था आणि मूलभूत सुविधांच्या विकासावर ठोस काम केले जाईल.
ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसून गावाच्या भवितव्यासाठी असते. त्यामुळे गावागावांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत “गाव बदलाचा निर्धार, नव्या राजकारणाची सुरुवात” हा संदेश पोहोचवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.