वेंगुर्ल्याहून दांडेली येथे लग्नसमारंभासाठी निघालेल्या मारुती इर्टिगा कारला मळेवाड-जांभळीचे भरड येथे भीषण अपघात झाला. सरळ रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. अपघात इतका जोरदार होता की गाडीतील एअरबॅगही उघडल्या. या दुर्घटनेत तीन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
या अपघातात दिया रमेश पाटकर (18) हिच्या हाताला, रमेश साबाजी शेगले (52) यांच्या डाव्या पायाला तसेच नम्रता वल्लभ शिरगावकर (27) यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.
तर वंदना वल्लभ शिरगावकर (50), रचना रमेश शेगले (45), मनस्वी रमेश पाटकर (16), वल्लभ जयदेव शिरगावकर (58) आणि चालक संजय एकनाथ भाटकर (46, सर्व रा. वेंगुर्ले) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हे सर्वजण दांडेली येथे लग्नसमारंभासाठी जात असताना हा अपघात घडला. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांना प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.