माण तालुक्यातील पळसावडे येथील मेंढपाळ हनुमंत बापू मासाळ हे आपल्या शेळ्या-मेंढ्यांसह सातारा तालुक्यातील कोंडवे परिसरात अनेक महिन्यांपासून वास्तव्य करून चराई करत होते. दरम्यान, बुधवार दि. १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसास सुरुवात झाली. याचवेळी जोरदार वादळी वाऱ्यासह वीज कोसळून त्यांच्या १८ शेळ्या-मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना कोंडवे ता. सातारा येथील गट नंबर ७२ मध्ये घडली असून, सदर शेत रमेश दत्तू चोरगे यांच्या मालकीचे आहे. अवकाळी पावसात अचानक वीज पडल्याने शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे मेंढपाळ हनुमंत मासाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत जनावरांची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी कोंडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचांसमक्ष पाहणी केली. त्यानंतर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी तसेच पंच म्हणून जमीर शेख, आकाश गुजर, संजय निंबाळकर व मानाजी निंबाळकर उपस्थित होते. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हनुमंत बापू मासाळ यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.