१५ दिवसांपासून संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू; विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा
समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन होऊन जवळपास दहा वर्षे उलटून गेली, तरी अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. या पार्श्वभूमीवर स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 23 एप्रिल 2026 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आटपाडी नगरपंचायत इमारतीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व महेशकुमार पाटील करत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. आटपाडी तालुका नाभिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, चौंडेश्वरी पतसंस्था आटपाडी, आटपाडी विणकर सोसायटी यांसह अनेक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन दर्शविले आहे. तसेच शेकडो शिवप्रेमी आणि सर्व समाजातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, मुंबई ही महाराष्ट्राची तसेच देशाची आर्थिक राजधानी असून, समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी भूमिपूजन झाले, त्याच ठिकाणी हे स्मारक उभारले गेले पाहिजे. जगभरात समुद्रात अनेक मोठे प्रकल्प उभे राहत असताना या स्मारकासाठी तांत्रिक किंवा परवानगीसंदर्भातील अडथळे कारणीभूत ठरू शकत नाहीत, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
महेशकुमार पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व समाजघटक, संघटना, पक्ष आणि शिवप्रेमींना आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा सरकारविरोधात नसून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकाला न्याय मिळावा आणि शिवरायांचा सन्मान वाढावा यासाठी सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असला तरी अनेक लोकप्रतिनिधी आणि जबाबदार नेत्यांनी अद्याप आंदोलनाची दखल घेतलेली नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. “आटपाडीमध्ये येऊनही काही आमदार, खासदार किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांत कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने आंदोलनाची विचारपूस केलेली नाही,” असा आरोपही करण्यात आला.
उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात, 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणाऱ्या उकाड्यात आंदोलनकर्ते ठिय्या देऊन आंदोलन सुरू ठेवत आहेत. स्मारकाच्या कामास तातडीने सुरुवात करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा शासनाकडे केली आहे.