ग्रामीण जीवनातील उपेक्षितांचे जगणे आणि संस्कृतीचे वास्तव मांडणारे आटपाडीचे लेखक विलास खरात यांच्या 'आकुबा आणि इतर कथा' या कथासंग्रहाने साहित्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित १६ वा 'राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार' खरात यांच्या संग्रहास जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ७५ हून अधिक साहित्यकृतींमधून निवड होत खरात यांनी पहिल्याच प्रयत्नात हा बहुमान पटकावला असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी २०२५-२६ या वर्षाचे पुरस्कार नुकतेच घोषित केले. ग्रामीण लोकमानस आणि संस्कृतीचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या साहित्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. खरात यांच्यासोबतच डॉ. देवानंद सोनटक्के यांच्या समीक्षा ग्रंथालाही या श्रेणीत सन्मानित करण्यात येणार आहे.
मातीचा आणि लेखणीचा सन्मान: विलास खरात
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विलास खरात यांनी भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "ग्रामीण जीवनातील उपेक्षितांच्या संवेदनांना 'आकुबा'च्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होता. पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरावरील अशा प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड होणे, हा माझ्या लेखणीचा आणि माझ्या मातीचा सन्मान आहे. या यशामुळे लेखकीय जबाबदारी अधिक वाढली आहे."
पुरस्काराचे इतर मानकरी:
मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार: मिथुन चंद्र चौधरी (आतली कवाडं) आणि संध्या लगड (पुसट सावल्या गडद काळ).
मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार: दिवाकर कृष्ण आचार्य (पीळ - कादंबरी), मुकूंदराज कुलकर्णी (नाथ मंदिरांतील दिवस - ललित), विलास सिदंगीकर (सणोत्सव - बालकविता) आणि आशा नेगी (लव इज लव - कादंबरी).
मातोश्री चांगुणा बाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार: प्रा. भास्कर भंगाळे (आस्वाद साहित्याचा).
संपादन ग्रंथ विभाग: वंदना कुलकर्णी (सोलापूरची काव्यप्रभा) आणि रमाकांत नारायणे (ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार).
पुण्यात रंगणार गौरव सोहळा
शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता, 'अक्षरवेल' सभागृह, रामबाण कॉलनी, लोकमान्य वाचनालयाजवळ, सदाशिव पेठ, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
विलास खरात यांच्या या यशाबद्दल योगीराज वाघमारे, सुहास घुमरे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ यांच्यासह आटपाडीतील साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.