अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून कृषी विभागाच्या नियोजनाचा तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन, पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी विभागातील त्रुटींमध्ये सुधारणा तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषी संशोधन क्षेत्रात व्यापक काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन व प्रशासन समन्वयाने कार्य करत आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी पंकज आशिया, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार श्री. विक्रम पाचपुते तसेच कृषी व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.