राज्यातील महसूल विभागाच्या सेवांना अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि दर्जात्मक स्वरूप देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान अधिक व्यापक करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी केली. मंत्रालयात आयोजित राज्यस्तरीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत बोलताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेला विभाग आहे. त्यामुळे केवळ संख्यात्मक कामगिरी न पाहता नागरिकांना दर्जात्मक आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यात अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र फ्रेमवर्क तयार केले जाणार आहे.
मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले की, ‘शिवराजस्व समाधान शिबीर’ अभियानामुळे महसूल विभागाबाबत जनतेमध्ये विश्वास वाढला आहे. आगामी काळात विधानपरिषद सदस्यांच्या समन्वयातून हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविले जाणार आहे.
यावेळी आमदार Vikrant Patil यांची ‘राज्यस्तरीय समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. लोकसहभाग वाढवणे तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी विधानपरिषद सदस्यांना जबाबदारी देऊन अभियानाच्या कामकाजावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला आमदार Prasad Lad, Yogesh Tilekar, अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. काही सदस्यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदविला.