मुंबई .प्रतिनिधी
राज्यातील रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करून रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महारेल’ (महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ) संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी एकूण १३१ प्रस्तावित कामांपैकी पहिल्या टप्प्यातील ६५ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील रेल्वे फाटकांवरील वाहतूक समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. मंजूर करण्यात आलेल्या ६५ कामांमध्ये संबंधित रस्त्यांवरील २५ हजार ते १ लाख ‘टीव्हीयू’ (ट्रेन व्हेईकल युनिट) असलेल्या तसेच कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वाढते शहरीकरण लक्षात घेऊन राज्यातील विविध शहरांमध्ये ८० रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, महारेलने कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी HUDCO कडून कर्ज उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्यासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय, महारेल महामंडळाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महारेलमार्फत पूर्ण झालेल्या कामांची देयके राज्य शासनाने तातडीने अदा करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री Shivendrasinh Bhosale दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री Indranil Naik व आमदार Prasad Lad उपस्थित होते. याशिवाय विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, HUDCO चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक Sanjay Kulshreshtha आणि महारेलचे व्यवस्थापकीय संचालक Rajesh Kumar Jaiswal यांनी बैठकीत सहभाग घेतला.
राज्यातील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि अडथळामुक्त करण्यासाठी महारेलच्या माध्यमातून हाती घेण्यात येणारे हे प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.