जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना प्रक्रियेला महाराष्ट्रात सुरुवात झाली असून महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी संगणकाद्वारे एसई (Self Enumeration) पोर्टलवर आपली माहिती नोंदवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी भारत सरकारच्या सहसचिव तथा राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे आणि जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते.
याप्रसंगी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून मोठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडावा, असे आवाहन केले. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एसई) पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत कार्यरत राहणार आहे.
डॉ. निरुपमा डांगे यांनीही राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून या देशव्यापी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
जनगणना प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.