संगमनेर तालुक्यातील बहुप्रतिक्षित तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेला अखेर पुन्हा गती मिळाली असून, निंबाळे शिवारातील प्रवरा नदीकाठच्या पंपिंग स्टेशनमधून वडगाव पान येथील साठवण तलावात पाणी दाखल झाल्याने लाभार्थी २१ गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक अडचणी, जलजीवन मिशनची कामे आणि इतर कारणांमुळे ही योजना बंद होती. परिणामी शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुपालकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यापासून शेतीसाठी आवश्यक पाण्यापर्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. वाढत्या उन्हामुळे अनेक पिके करपण्याच्या स्थितीत आली होती.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते Balasaheb Thorat यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदारांशी सातत्याने पाठपुरावा करत योजना पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. वेळोवेळी सूचना देत त्यांनी कामाला गती दिली आणि अखेर आज या योजनेतून पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात यश आले.
विशेष म्हणजे, सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन बाळासाहेब थोरात यांनी तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेची संकल्पना प्रत्यक्षात आणली होती. या योजनेमुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला होता. आजही ही योजना हजारो नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
आज वडगाव पान येथील साठवण तलावात पाणी दाखल होताच लाभार्थी गावांतील ग्रामस्थांनी जलपूजन करत आनंद साजरा केला. “हे फक्त बाळासाहेब थोरात साहेबांमुळेच शक्य झाले,” अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. अनेक महिन्यांनंतर तलावात पाणी आल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लवकरच या योजनेअंतर्गत लाभार्थी गावांना नियमित पाणी वितरण सुरू होणार असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. तळेगाव प्रादेशिक पाणी योजना पुन्हा कार्यान्वित झाल्याने संगमनेर तालुक्यातील २१ गावांच्या पाणीप्रश्नावर मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.