पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांना संरक्षणाची कवच द्या!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेनकोट आणि गणवेशाचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांचा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असून, पावसाळ्याच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.दर्जेदार गणवेश आणि रेनकोट उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल तसेच शाळेतील नियमित उपस्थितीतही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच महापालिका प्रशासनाने रेनकोट व गणवेश खरेदी, वितरण आणि वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या सुविधांचा लाभ पोहोचवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा आणि सुरक्षिततेचा विचार करून महापालिका प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी व्यक्त केली आहे.