तासगाव: तासगाव शहर आणि उपनगरांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या गुन्ह्यांनी उच्चांक गाठला असून, चोरट्यांनी आता आपला मोर्चा थेट नवीन बांधकामाधीन घरांकडे वळवला आहे. तासगाव शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तमाळ, गणेश कॉलनी, वृंदावन कॉलनी आणि अमृतेश्वर नगर या परिसरात रात्रीच्या आणि पहाटेच्या सुमारास बांधकामाचे महागडे साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या भागामध्ये साहित्याची चोरी करणारी एक मोठी टोळी सक्रिय झाली असून, यामुळे स्थानिक घरमालक आणि बांधकाम कॉन्ट्रॅक्टर पुरते हतबल झाले आहेत.
लोखंडी सळ्या आणि सेंट्रींग साहित्यावर डल्ला
सध्या बाजारामध्ये घर बांधणीचे साहित्य, विशेषतः लोखंड आणि सेंट्रींगचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत चोरटे प्रामुख्याने बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळ्या (स्टील), सेंट्रींग प्लेटा, लोखंडी पाईप आणि इतर सेंट्रींग साहित्याला टार्गेट करत आहेत. रात्रीच्या अंधाराचा आणि पहाटेच्या शांततेचा फायदा घेऊन ही टोळी हजारो रुपयांच्या साहित्यावर डल्ला मारत आहे. एका बाजूला वाढती महागाई आणि दुसऱ्या बाजूला होणाऱ्या या चोऱ्यांमुळे घरमालकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे, तर कॉन्ट्रॅक्टरना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
संशयास्पद महिला व अज्ञात चोरट्यांचा वावर
स्थानिक नागरिकांनी आणि रात्री पाळत ठेवणाऱ्या काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोऱ्यांमध्ये प्रामुख्याने काही संशयास्पद महिलांचा वावर आणि रात्री-अपरात्री वाहने घेऊन येणारे अज्ञात चोरटे सक्रिय असल्याचे अनेक ठिकाणी समोर आले आहे. दिवसा रेकी करायची आणि रात्री किंवा पहाटेच्या सुमारास वाहने आणून साहित्य लंपास करायचे, अशीच काहीशी या चोरांची कार्यपद्धती असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी नागरिकांनी चोरांना रंगेहात पकडण्याचे प्रयत्न केले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरत आहेत.
तासगाव पोलिसांकडे साकडे; चोरांना आवरण्याची मागणी
या भागात सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक आणि व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दिवस-रात्र कष्ट करून घर उभारणारे मालक आणि बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांनी आता थेट तासगाव पोलीस प्रशासनाला साकडे घातले आहे. या वाढत्या चोऱ्यांना तातडीने आळा घालावा, परिसरातील रात्रीची पोलीस गस्त वाढवून या चोरांच्या टोळीचा कायमचा बंदोबस्त करावा आणि पीडित नागरिकांना न्याय द्यावा, अशी तीव्र मागणी घरमालक व कॉन्ट्रॅक्टर्सकडून करण्यात येत आहे.