डहाणू तालुक्यातील मानपाडा-वाघाडी आणि सोनाळे खुबरोखपाडा या भागात गेल्या १० जुलै २०२६ पासून आज २७ जुलै २०२६ पर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असून, तब्बल १७ दिवसांपासून नागरिक अंधारात जीवन जगत आहेत. सततच्या वीजखंडितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ग्रामस्थांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरातील वीज वितरणासाठी असलेली डीपी पूर्णपणे जीर्ण झाली असून ती सडलेली, तुटलेली व काही ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहे. तसेच वीजवाहिन्याही तुटलेल्या व खराब झालेल्या असल्याने वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. गंभीर बाब म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे वायरमन किंवा संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष, आदिवासी अस्मिता संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष तसेच ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्ष विलास वांगड यांनी महावितरण प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित डीपीची तातडीने दुरुस्ती अथवा नवीन डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
तसेच, या जीर्ण डीपीमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास महावितरण डहाणू व सूर्यानगर कार्यालय जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत महावितरणच्या डहाणू व सूर्यानगर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विलास वांगड यांनी दिला आहे.