संपूर्ण जगाचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून देवशयनि आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूर नगरीकडे असंख्य साधुसंत, महंत व महाराज यांच्या दिंड्या व पालखी सोहळे "ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये"आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करत असतात . त्याप्रमाणेच बत्तीस शिराळ्याहून श्री. गोरक्षनाथ महाराज पुसेगावहून सेवागिरी महाराज तर शेकोबा दादा महाराज, दादा महाराज सातारकर कोटेश्वर शिरसवडी इंचगिरी, हरिहर गड सुळेवाडी (पिलीव) हरिहर बाबा महाराज, सद्गुरु रामगिरीबाबा महाराज (शिरढोण)अशा अनेक साधुसंत, महंत, व महाराजांच्या दिंडी व पालखी सोहळ्यांनी सांगली सातारा व इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करून ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या पिलीव नगरीमध्ये "राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम"च्या निनादात खांद्यावरती भगवी पताका घेऊन प्रवेश करताच ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या मनामध्ये भक्तीभाव निर्माण होऊन अतिशय आनंदामध्ये सर्व घटकातून फटाक्याच्या आतषबाजीत व तोंडातून हरिनामाच्या जयघोषाने जागोजागी घरोघरी अतिशय भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. दिंडी व पालखी सोहळ्यातील भाविकांच्या फुगडी नृत्याने त्याचप्रमाणे अभंगाने अंतकरणापासून आनंद व्यक्त केला जात होता व प्रत्येक नागरिक मोठ्या भक्ती भावाने दर्शनाचा लाभ घेत असल्याचे चित्र दिसून आले. व पिलीवला प्रति पंढरपूरचे स्वरूप आल्याचे दिसून आले. सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद त्याचप्रमाणे आरोग्य विषयी सुविधा, तसेच रस्तो रस्ती स्वच्छता, दिव्यांचा लखलखाट यामुळे पिलीव नगरी गजबजलेली दिसून आली. प्रशासक अश्वजीत सरवदे, सदाशिव भंडलकर ग्रामपंचायत अधिकारी पिलीव, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग वीज वितरण कंपनी महसूल विभाग तरुण मंडळे विविध संघटना व सर्व ग्रामस्थ यांनी या काळामध्ये सहकार्य केले.