आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जलजन्य साथरोग नियंत्रणासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जलस्रोतांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. एप्रिल २०२६ मध्ये राबवण्यात आलेल्या या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत १०२५ गावांमधील ७९२३ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. यात दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील एकही जलस्रोत दूषित आढळला नाही. पाणी शुद्ध आढळलेल्या १०२५ ग्रामपंचायतींना 'ग्रीन कार्ड' देण्यात आले आहे.
तथापि, काही ग्रामपंचायतींमधील २८३ जलस्रोतांचा परिसर अस्वच्छ आढळल्याने त्यांना 'यलो कार्ड' देण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींना पावसाळ्यापूर्वी जलस्रोतांच्या परिसराची स्वच्छता करण्याच्या सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. शिवाय साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊन नागरिक साथरोगांना बळी पडतात. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत (२०२१ ते २०२६) कुठेही साथरोगांचा मोठा प्रादुर्भाव झालेला नाही. तरीही आगामी पावसाळ्यात कोणतीही जोखीम न पत्करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यलो कार्डच्या गावांना करावी लागणार जलस्रोतांची स्वच्छता.
पाच वर्षांपासून साथरोग नाही
सोलापूर जिल्ह्यात २०२१-२२ पासून २०२५-२६ या सलग पाच वर्षांच्या कालावधीत कोठेही जलजन्य किंवा इतर साथरोगांचा मोठा प्रादुर्भाव झालेला नाही. आरोग्य विभागाच्या नियमित उपाययोजना आणि जलशुद्धीकरण मोहिमांमुळे हे शक्य झाले आहे. तरीही आगामी पावसाळ्यात असे आजार उद्भवू नयेत, याची खबरदारी सध्या प्रशासनाकडून घेतली जात आहे.
जलस्रोतांची व्यापक तपासणी
झेडपी आरोग्य विभागाने एप्रिल २०२६ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले. यात १०२५ ग्रामपंचायतींअंतर्गत येणारे नळपाणी, बोअर, विहिरी, विद्युत पंप, हातपंप आणि सार्वजनिक अशा एकूण ७९२३ जलस्रोतांची बारकाईने तपासणी करण्यात आली. सुदैवाने या तपासणीत एकही पाण्याचा नमुना दूषित आढळला नाही.