देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली तरी माण तालुक्यातील सामान्य जनता अजूनही रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शासकीय प्रशासनाकडून अपुऱ्या उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप करत, येत्या १५ जून २०२६ पर्यंत हे प्रश्न सुटले नाहीत तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 'कुकुडवाड जि. प. परिषद शिवसेना शिंदे गटाचे' सुरेश भगवान गोरड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात त्यांनी बुधवार (दि. ३ जून) रोजी माण-खटावचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण अभियंता आणि स्थानिक पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनातील प्रमुख मागण्या माण तालुक्यातील ज्या गावांमध्ये सध्या शासकीय टँकर सुरू आहेत, तेथील वाढीव टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे धूळ खात पडले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रभावित गावांमध्ये जादा टँकर सुरू करावेत.वडजल ते झरे हा रस्ता अत्यंत बिकट अवस्थेत असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना व ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.दहिवडी येथील महावितरण कार्यालयाला वारंवार पत्र देऊनही परिस्थिती जैसे थे आहे. सातत्याने होणाऱ्या वीज खंडिततेमुळे शेतकरी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले असून यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी. "प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास १५ जून २०२६ रोजी जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल," असा स्पष्ट इशारा अर्जदार सुरेश गोरड यांनी दिला आहे.