बीड | प्रतिनिधी
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी नैसर्गिक शेतीचा संकल्प करत गोपीनाथगड परिसरातील शेतीला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मशागतीच्या कामात सहभाग घेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेतीचा संदेश दिला.
शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, रासायनिक शेतीवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि पर्यावरणाचे संवर्धन साधत उत्पादनवाढीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पंकजाताईंनी सांगितले. नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल आणि नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून ओळख असलेले आचार्य देवव्रत यांनी विकसित केलेल्या ‘नैसर्गिक शेती मॉडेल’चा उल्लेख करत, या पद्धतीचा अवलंब आपल्या भागातील शेतकऱ्यांनी करावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त घेतलेला हा संकल्प आगामी काळात व्यापक जनचळवळीचे स्वरूप धारण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याचबरोबर ‘एक पेड पिता के नाम’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पंकजाताईंनी वृक्षारोपणही केले. पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या प्रसंगी डॉ. प्रीतम मुंडे, आर्यमन मुंडे, अगस्त्य मुंडे, स्थानिक पदाधिकारी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक शेती, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.