म्हसवड, पुळकोटी, जांभुळणी आणि काळचौंडी परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि डबरे अखेर प्रशासनाकडून भरण्यात आले आहेत. ‘आम आदमी पार्टी’चे माण तालुकाध्यक्ष विक्रम काळेल यांनी प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे हे रखडलेले काम मार्गी लागले असून, यामुळे लाखो भाविक आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
भाविकांची होणारी गैरसोय टळली
प्रसिद्ध भोजलिंग देवस्थान, म्हसवड देवस्थान आणि खरसुंडी देवस्थानला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील गुजरात राज्यातूनही लाखो भाविक आणि भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. मात्र, गेल्या काही काळापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. जागोजागी मोठमोठे खड्डे आणि डबरे पडल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत होते, तर अपघातांचा धोकाही प्रचंड वाढला होता. दूरवरून येणाऱ्या भाविकांना या खड्ड्यांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत आम आदमी पार्टीचे माण तालुकाध्यक्ष विक्रम काळेल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, यासाठी सतत तगादा लावला होता. भाविकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी रस्ता दुरुस्त करणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, प्रशासनाने यंत्रणा हलवून रस्त्यावरील डबरे आणि खड्डे खडी व डांबर टाकून व्यवस्थित भरले आहेत.