केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच रामदास आठवले यांच्या जत तालुका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्यक्रम पार पडणार असून रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ मार्च १९३४ रोजी भेट दिलेल्या जत तालुक्यातील ऐतिहासिक स्थळाला रामदास आठवले भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान त्या ठिकाणाची पाहणी करून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारणीबाबत चर्चा केली जाणार आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याशिवाय, जत तालुक्यातील येळवी (ता. जत) येथे रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले) नामफलकाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे राज्य व जिल्हास्तरीय अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दौऱ्यात रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव व माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे तसेच अरविंद कांबळे, पोपट कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने सामाजिक न्याय, आंबेडकरी चळवळ, दलित समाजाच्या प्रश्नांवरील चर्चा तसेच संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.