अंबड ते चौंडी या नव्याने सुरू झालेल्या एसटी बससेवेच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी एका भाविकाने अहिल्यामातेच्या दर्शनासाठी केलेला जिद्दीचा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. सामाजिक कार्यकर्ते मल्हारश्री अनिल भालेकर यांनी तहान-भूक विसरून तब्बल नऊ ते दहा तासांचा प्रवास करत चौंडी येथे जाऊन अहिल्यामातेचे दर्शन घेतले.
अंबड-चौंडी बससेवेचे उद्घाटन झाल्यानंतर बस प्लॅटफॉर्मवर उभी असताना प्रवासी संख्या कमी असल्याने बस रवाना करण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. यावेळी बसच्या महिला कंडक्टर यांनी प्रवासी नसल्याचे आणि वेळ झाल्याचे कारण सांगत बस सोडण्याबाबत निरुत्साह व्यक्त केला. मात्र, लक्ष्मण बेवले सर, सुनील भाऊ भिडे, बाबुराव भाऊ खरात यांच्यासह उपस्थितांनी आगर प्रमुख आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
“चौंडीला जाणारा किमान एक प्रवासी असेल तर बस जाईल,” असा निर्णय झाल्यानंतर अनिल भालेकर स्वतः बसमध्ये जाऊन बसले आणि अखेर बस चौंडीकडे रवाना झाली.
कोणतीही पूर्वतयारी नसताना सुरू झालेल्या या प्रवासात मोबाईलची चार्जिंग संपली, जेवणाची सोय नव्हती आणि वाटेत बस कुठेही थांबली नाही. मात्र, अहिल्यामातेच्या दर्शनाची तीव्र ओढ आणि मनातील श्रद्धेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण प्रवास पूर्ण केला.
दरम्यान, पाटोदा बसस्थानक येथे बसचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. या उत्साही वातावरणामुळे प्रवासातील थकवा कमी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चौंडी येथे पोहोचून अहिल्यामातेच्या चरणी नतमस्तक होताच सर्व थकवा दूर झाल्याची अनुभूती आल्याचे भालेकर यांनी सांगितले. “अहिल्यामातेने मलाच दर्शनासाठी बोलावले असावे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या प्रवासानंतर नव्या ऊर्जेने प्रेरित झालेल्या अनिल भालेकर यांनी होळकरशाहीच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.