माण तालुक्यातील आंधळी गावामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने थैमान घातले असून, यामुळे येथील प्रयोगशील शेतकरी जयकुमार दडस यांच्या टोमॅटोच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, अद्याप महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा न झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंधळी येथील शेतकरी जयकुमार दडस यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर व तार-बांबूचा आधार (स्टेकिंग) देऊन मोठ्या कष्टाने टोमॅटोची बाग फुलवली होती. बाग सध्या चांगल्या बहरात असून झाडांना मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागलेले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या अचानक अवकाळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे टोमॅटोचे उभे पीक जमिनीदोस्त झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे टोमॅटोला आधार दिलेले बांबू आणि तारा तुटून पडल्या आहेत, ज्यामुळे झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडे मोडून पडल्याने व फळे मातीला मिळाल्याने ती सडण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकरी जयकुमार दडस यांनी या बागेसाठी खते, औषधे, मल्चिंग आणि मजुरी असा लाखो रुपयांचा भांडवली खर्च केला होता. मात्र, हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे दडस यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या तोट्यातून कसे सावरायचे, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
एवढे मोठे नुकसान होऊनही अद्याप कृषी विभाग किंवा महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या भागाची पाहणी केलेली नाही. शासनाने तात्काळ या बागेचा पंचनामा करून दडस यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आंधळी गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वेळेत पंचनामा न झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा आणि सरकारी मदतीचा लाभ मिळणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.