संगमनेर तालुक्यातील तिगाव गावातील सानप कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सानप कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. महेश गोरख सानप (वय १८) आणि ओमकार गोरख सानप (वय १६) या दोन कोवळ्या भावांचा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ गावाजवळील पाण्याच्या ठिकाणी गेले असता दुर्दैवाने पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, दोघांनाही वाचविण्यात अपयश आले. या दुर्दैवी घटनेमुळे तिगाव गावासह संपूर्ण संगमनेर तालुका शोकमग्न झाला आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही भावांच्या डोक्यावर आधीच वडिलांचे छत्र नव्हते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबावर नियतीने पुन्हा एकदा कठोर आघात केला आहे. दोन तरुण मुलांचे एकाच वेळी निधन झाल्याने आई व कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले.
महेश व ओमकार हे स्वभावाने शांत, मनमिळावू व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे होते. त्यांच्या अकाली जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर परिसरातील धोकादायक पाणवठे, खाणी व साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महेश गोरख सानप व ओमकार गोरख सानप या दोन्ही भावांना भावपूर्ण श्रद्धांजली.