“अधिकारी / कर्मचारी जोमात, सर्वसामान्य जनता मात्र कोमात” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आटपाडी तहसील कार्यालयातील भोंगळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे.
आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता नागरिक तहसील कार्यालयात विविध कामांसाठी उपस्थित झाले असता, अनेक कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित नसल्याचे दिसून आले. दुपारी तब्बल 2.45 वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात न आल्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. याबाबत विचारणा केली असता “सर्व्हर डाऊन आहे” असे कारण देण्यात आले.
दरम्यान, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ नागरिक सौ. यशोदा बापू कोळी (वय 76) यांच्या उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र आजअखेर संबंधित दाखला देण्यात आलेला नाही. सदर प्रकरण तहसील कार्यालयातील वाघमोडे मॅडम यांच्या टेबलवर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
दिनांक 20 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता “सर्व्हर डाऊन आहे” तसेच “दाखला देण्याची मुदत 15 दिवसांनंतर आहे” असे उत्तर देऊन अर्जदारांना परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे हा दाखला दिव्यांग व्यक्तीच्या पेन्शन संदर्भातील महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक असूनही प्रशासनाने कोणतीही संवेदनशीलता दाखवली नसल्याचा आरोप होत आहे.
शासन स्तरावर ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागणूक देण्यासाठी विविध कायदे आणि योजना राबवल्या जातात. दिव्यांग व्यक्तींना विशेष सहाय्य देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात काही अधिकारी आणि कर्मचारी सामान्य जनतेची पिळवणूक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा युवक आघाडीचे उपाध्यक्ष शरद वाघमारे यांनी मा. मुख्यमंत्री, मा. मानव अधिकार आयोग तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली ही व्यथा मांडत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.