जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत -पालकमंत्री जयकुमार गोरे

👤 अतुल फसाले सोलापुर | 📅 12 May 2026 | 👁 99 Views
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत -पालकमंत्री जयकुमार गोरे
खरीप हंगाम 2026.... निविष्ठा विक्रेत्याने लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई जिल्ह्यात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे कृषी विभागाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे अल निनो सुरक्षा कवच पंचसुत्रीचे पालन करावे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून कृषी निविष्ठाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी तक्रारी करण्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध केला जाणार महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये कृषी दरात सोलापूर जिल्हा प्रथम
जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाने 4 लाख 99 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केलेले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे. तरी कृषी व संबंधित विभागांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक प्रमाणात व वेळेवर उपलब्ध करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम 2026 आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, खते पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कृषी विभागाने वेळेतच खते व बियाणे उपलब्ध करून घ्यावेत तसेच विक्रेत्यामार्फत विनालिंकिंग शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत. जे निविष्ठा विक्रेते लिंकिंग करून शेतकऱ्यांना बोगस खते व बियाणे विकत असतील अशा विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी. यामध्ये लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशील होऊन काम करावे व लिंकिंग होऊ देऊ नये. पोलीस विभागाने यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्यावर त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून घ्यावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.
मागील वर्षी अतिवृष्टी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान तात्काळ वाटप झाले पाहिजे. शेतकऱ्यांची एकदा इ केवायसी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा ई केवायसी करू नये व संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वितरित करावे. ही केवायसी अनुषंगाने मंत्रिमंडळाने पुनर्वसन सचिवांना याबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाने अनुदान वितरण करणे अनिवार्य असल्याचे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सुचित केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेत जमिनीचे माती परीक्षण करून घेण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रबोधन करावे. तसेच जिल्ह्याला एकच माती परीक्षण लॅब आहे. तरी यापुढील काळात प्रत्येक तालुक्याला माती परीक्षण लॅब असावी याबाबत प्रयत्न करणार असल्याचे श्री गोरे यांनी सांगून कृषी विभागाने फळबाग लागवडीत चांगले काम करावे यासाठी मागील वर्षीपेक्षा यावर्षी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट करावे व प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने अल निनो सुरक्षा कवच पंचसूत्री राबवावी. यामध्ये पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पावसाचा खंड व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आदीबाबत सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडे प्रलंबित असलेले डीपी दोन दिवसात दुरुस्त करून शेतकऱ्यांना सुरळीतपणे वीज पुरवठा करावा. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज केला पाहिजे, असे ही सूचना त्यांनी दिल्या.
*क्यूआर कोड चे विमोचन -
कृषी निविष्ठांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहज व सुलभ पद्धतीने तक्रार नोंदविता येईल यसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून क्यूआर कोड तयार करण्यात आलेला आहे. हा क्यूआर कोड प्रत्येक ग्रामपंचायत कृषी सहाय्यक कार्यालयात उपलब्ध करून दिला जाणार आहे त्या अनुषंगाने संबंधित शेतकरी यावर तक्रार नोंदवतील व त्या तक्रारीची दखल घेऊन जास्तीत जास्त सात दिवसात त्याचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत या तक्रार निवारण क्यूआर कोड चे विमोचन करण्यात आले.
प्रारंभी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. मागील वर्षी चार लाख 17 हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी पेरणी झालेली होती तर यावर्षी चार लाख 99 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी खते व बियाणे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होतील याचेही नियोजन झालेले असून बफर स्टॉक ही उपलब्ध आहे असे माहिती त्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख 51 हजार 900 मेट्रिक टन इतका खत उपलब्ध असल्याचे सांगितले.
केळी लागवड, फळ लागवड, पीक परिस्थितीत होत असलेला बदल, पीक कर्ज वाटप, नमो शेतकरी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान, पीएम किसान सन्मान निधी, माती परीक्षण पत्रिका या विषयी श्री. भोसले यांनी सविस्तर माहिती बैठकीत दिली.
यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, बाळासाहेब देशमुख, समाधान आवताडे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, नारायण पाटील यांनी ही कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत. तसेच लिंकिंग होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली.
प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंबा फळझाडाला पाणी घालून, सोयाबीन पिकाची प्रातिनिधिक स्वरूपात पेरणी करून तसेच दीप प्रज्वलन करून खरीप हंगाम बैठकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच उत्कृष्ट उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर कृषी विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
00000
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |