प्रशासकीय सेवेत जाणे ही केवळ एक नोकरी नसून समाजपरिवर्तनाची एक सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि कठोर मेहनतीच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही या परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवू शकतात," असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त श्रीम. संजीता महापात्र (भा.प्र.से.) यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सांगली मनपा आणि श्री गणपती पंचायत संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिराचे पहिले सत्र शनिवार, दि. ६ जून रोजी एकात्मता भवन (गणपती मंदिर) येथे उत्साहात संपन्न झाले. या सत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून आयुक्त श्रीम. संजीता महापात्र यांनी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना यशाचा 'रोडमॅप' दिला.
इंग्रजी किंवा दिल्लीची गरज नाही!
परीक्षांबाबतचे गैरसमज दूर करताना आयुक्त म्हणाल्या, "या परीक्षांसाठी इंग्रजीची अनिवार्यता किंवा दिल्लीला जाऊन अभ्यास करण्याची गरज नाही. आजच्या डिजिटल युगात मराठी माध्यमातून घरबसल्या अभ्यास करूनही ग्रामीण विद्यार्थी देशात अव्वल येत आहेत." त्यांनी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांची सविस्तर माहिती देत 'सातत्य \times पुनरावलोकन \times सराव = यश' हा त्रिसूत्री मंत्र दिला. दररोज वृत्तपत्र वाचन आणि नियमित उत्तरलेखनाचा सराव करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
या उपक्रमाला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त दिनेश जाधव, नकुल जकाते, विनायक शिंदे, सिस्टीम मॅनेजर प्रद्युम्न जोशी, ग्रंथपाल संतोष बेलवलकर, सामाजिक कार्यकर्ते राकेश दड्डनावर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.