महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत येथील 'जिजाऊ महिला ग्रामसंघ कुळकजाई'ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ जून २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या सभेमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सभेच्या सुरुवातीला ग्रामसंघाचा वार्षिक ताळेबंद आणि लेखाजोखा वाचून दाखवण्यात आला. तसेच सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात करावयाच्या कामांचे नियोजन करून नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नाविन्यपूर्ण व्यवसायांची निवड समुदाय गुंतवणूक निधी (CIF) आणि बँक कर्जाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कोणत्या व्यवसायांना प्राधान्य द्यावे, यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने गारमेंट्स (कपडे) व्यवसाय आणि फ्रोझन वाटाणा (Frozen Peas) प्रक्रिया उद्योग यांसारख्या लहान-मोठ्या उद्योगांची निवड करण्यात आली. याशिवाय, 'उमेद पोषण परसबाग' उपक्रमांतर्गत गावात सेंद्रिय भाजीपाला तयार करण्याचा निर्णयही महिलांनी घेतला.
सामाजिक विषयांवर भर केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून आगामी काळात गावातील महिलांसाठी आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करणे आणि स्वच्छता अभियानावर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती या सभेला मार्गदर्शक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी अमोल पवार, माण पंचायत समिती (उमेद) चे सुनील काळे, पाणी फाऊंडेशनचे जितेंद्र फडतरे, 'आत्मा'चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल करचे आणि समन्वयक सुजित बनसोडे उपस्थित होते. या मान्यवरांनी महिलांना शासकीय योजना व उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गावातील ग्रामसखी, कृषी सखी, ग्रामसंघाचे नूतन पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित होत्या. सभेचे नियोजन व आभार प्रदर्शन ग्रामसंघाच्या सदस्यांनी केले.